एकाचा मृत्यू – ७ ते ८ जण जखमी
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली: अंत्यसंस्कारासाठी प्रेत घेऊन जात असलेल्या स्वर्गरथाच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने मुख्य मार्गावरून स्वर्गरथ थेट शेतात शिरल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर ७ ते ८ जण जखमी असल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै येथे कुनघाडा फाट्यावर सकाळी ११ वाजता घडली.
प्राप्त माहितीनुसार, चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै येथील ग्रामपंचायतच्या मालकीचे स्वर्गरथ अंत्यसंस्कारासाठी प्रेत घेऊन हायवे रस्ता पार करून वैनगंगा नदीकडे जात होते. दरम्यान स्वर्गरथाच्या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन हायवे वरून भरारी घेऊन दुसऱ्या बाजूला थेट शेतात गेल्याने अपघात झाला. या अपघातात जवळपास ७ ते ८ लोक किरकोळ जखमी झाले व त्यातील एक अंत्यविधी पूर्ण केल्यानंतर गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले व नंतर गडचिरोली सामान्य रुग्णालयात नेत असताना येवली जवळ त्याचा हृदय विकाराने मृत्यू झाला.
कुनघाडा रै हे गाव गडचिरोली चामोर्शी हायवेवरून 2 किमीअंतरावर आहे. कुनघाडा गावापासून वैनगंगा नदी अंदाजे ४ किमी अंतरावर आहे. ग्रामवासियांना नदीपर्यंत प्रेत नेण्यासाठी अडचण निर्माण होऊ नये म्हणून ग्रामपंचायतने स्वर्गरथाची व्यवस्था करण्यात आली आहे. कुनघाडा येथील प्रभाकर विठोबा वासेकर यांचे निधन झाल्याने एम एच ३३ टी १३९५ क्रमांकाचे स्वर्गरथ प्रेत घेऊन वैनगंगा नदीवर अंत्यसंस्कारासाठी घेऊन जात असताना वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी हायवे वरून भरारी घेत शेतात पडली वाहनातील भगवान गव्हारे, विनोद सातपुते, कवळू सातपुते, बंडू वासेकर, काशिनाथ कुकडे, लोमेश सातपुते, योगराज बुरांडे, मारोती सातपुते यासह आदी लोक किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यातील भगवान गव्हारे व लोमेश सातपुते यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याचे समजते.
दरम्यान मयत प्रभाकर वासेकर यांचे नातेवाईक मृत बालाजी वासेकर हे अंत्यविधी पूर्ण झाल्यानंतर गंभीररित्या खाली कोसळले त्यांना कुनघाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले परिस्थिती अती गंभीर असल्यामुळे त्यांना गडचिरोली सामान्य रुग्णालयात नेत असताना येवली जवळ त्यांची प्राणज्योत मावळली
ग्रामपंचायतीचा निष्काळजीपणा
ग्रामपंचायतने वाहन चालविण्यासाठी रोजंदारीवर असलेल्या वाहन चालकाची नेमणूक केली सदर वाहन चालक हा कचरा गाडीचा चालक आहे त्याला स्वर्गरथ गाडीचा फारसा अनुभव नाही. स्वर्गरथ चालविण्यासाठी अनुभवी चालकाची नेमणूक करायला हवी होती. मात्र ग्रामपंचायतने याकडे गांभीर्याने विचार केला नाही त्यामुळे ही घटना घडली या घटनेत स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचा निष्काळजीपणा झाला असल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे. याबाबत ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी कुनघाडकर यांना विचारणा केली असता. स्वर्गरथ चालक हा आजारी असल्यामुळे तो रजेवर आहे. पर्यायी चालक म्हणून कचरा वाहन चालकाची पर्यायी व्यवस्था केली. स्वर्गरथ घेऊन जाताना चालक व्यवस्थित होता . अशी दुर्दैवी घटना घडणार असे आम्हाला वाटले नाही. अनावधाने ही घटना घडली यात ग्रामपंचायतीचा कोणताही कसूर नाही.










