– प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, :- महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे दारूबंदी लागू केलेल्या गडचिरोली जिल्ह्यात, प्रत्यक्षात मात्र अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट सुरू असून, या बेकायदेशीर धंद्यामुळे मागील काही महिन्यांत २१ निरपराध नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत सामाजिक कार्यकर्ते जावेद खान यांनी तीव्र संताप आणि चिंता व्यक्त केली. “दारूबंदी केवळ कागदावर असून, जिल्ह्यात सर्रासपणे बनावट, भेसळयुक्त आणि अत्यंत घातक दारू विकली जात आहे. या दारूमुळे मागील तीन महिन्यांत २१ कुटुंबांवर मृत्यूचं संकट ओढावलं आहे. हे केवळ कायद्याचं उल्लंघन नाही, तर माणसाच्या जीवनावर झालेला थेट आघात आहे,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
पोलीस प्रशासनावर ठपका
जावेद खान यांनी पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधताना म्हटले, “माझी पोलीस निरीक्षक साहेबांना नम्र पण ठाम विनंती आहे की, त्यांनी याकडे तातडीने गांभीर्याने लक्ष द्यावे. केवळ कारवाई पुरेशी नाही – या अवैध दारू टोळीचा पूर्णपणे बंदोबस्त करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी.”
दारूबंदी कायद्याच्या उल्लंघनावर ठाम भूमिका
खान यांनी यावेळी महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ अंतर्गत हे गंभीर गुन्हे असल्याचे स्पष्ट केले आणि पोलीस व महसूल यंत्रणांनी स्वयंस्फूर्तीने कारवाई न केल्यास ते कर्तव्यात कुचराई समजले जाईल, असा इशाराही दिला.
“ही मृत्यूंमालिका कोणत्याही आजारामुळे नाही – ती दुर्लक्ष, निष्काळजीपणा आणि व्यवस्थेच्या अकार्यक्षमतेमुळे घडलेली हत्या आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली.
शासनाकडे ठोस उपाययोजनांची मागणी
दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र विशेष पथकाची स्थापना, ग्रामपातळीवर जनजागृती मोहिमा, आणि मृत्यूंमागील दोषींवर गुन्हे दाखल करून त्यांना न्यायाच्या कक्षेत आणणे, अशी ठोस मागणी जावेद खान यांनी प्रशासनाकडे केली आहे.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #crime @gadachiroli police )










