स्पर्धा परिक्षांचे भरमसाठ वाढविलेले शुल्क कमी करुन परिक्षार्थ्यांना दिलासा द्या.

0
84

आमदार सुभाष धोटेंची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.

लोकवृत्त न्यूज
राजुरा (ता. प्र.) २५ जून :– राज्य शासनाकडून वन विभागातील वनरक्षक, स्टेनो, लेखापाल, महसूल विभागातील तलाठी, गृह विभागातील राज्य उत्पादन शुल्क खात्यांतर्गत जवान पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेबद्दल स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या बेरोजगार युवक युवतींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतू दुसरीकडे मात्र परिक्षार्थी भरती प्रक्रिया शुल्कापोटी आर्थिक विवंचनेत असल्याचे दिसून येत आहे.
या तिन्ही भरती प्रक्रिया टी. सी. एस. या खासगी कंपनी मार्फत राबविण्यात येत असून ऑनलाईन पध्दतीने ही परिक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी अमागास प्रवर्गासाठी रुपये 1000/- आणि मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अथान प्रवर्गासाठी रुपये 900/- एवढे परिक्षा शुल्क ठेवण्यात आले आहे. सदरची परिक्षा शुल्क रक्कम ही मोठी असून विद्यार्थ्यांना एवढे शुल्क भरणे कठीण आहे. आधीच बेरोजगार त्यातही हालाखीच्या परिस्थितीत अहोरात्र अभ्यास करुन हे विद्यार्थी परिक्षेला सामोरे जात आहे. मात्र भरमसाठ ठेवलेल्या शुल्कामुळे विद्यार्थ्यांना परिक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. असे असतांना राज्य शासनानी सदरहु शुल्क कमी करण्याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे. तरी राज्य शासनानी होऊ घातलेल्या नोकर भरती प्रक्रिया शुल्क कमी करण्यासाठी तातडीने निर्णय घेवून राज्यातील बेरोजगार व होतकरू विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here