गडचिरोली शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमणाचा विळखा

158

मनसेची प्रशासनाला निवेदनाद्वारे तीव्र मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. १३ : गडचिरोली शहरातील मुख्य रस्त्यावर वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर गंभीर ताण निर्माण झाला असून, नागरिकांना व वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गडचिरोली तर्फे मुख्याधिकारी, नगर परिषद गडचिरोली यांच्याकडे निवेदनाद्वारे तातडीने कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे.
मनसेच्या प्रतिनिधींनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, मुख्य रस्त्यावर दुकानदारांकडून पदपथांवर आणि वाहतुकीच्या मार्गावर थेट अतिक्रमण करण्यात आले आहे, परिणामी वाहनांची सतत कोंडी होत असून, शालेय वाहने, रुग्णवाहिका व इतर आपत्कालीन सेवांनाही अडथळे निर्माण होत आहेत.
यासोबतच रस्त्याच्या दुभाजकांवर लावण्यात येणारे अनधिकृत बॅनर, फलक व जाहिराती वाहनचालकांचे लक्ष विचलित करत आहेत, जे अपघातास कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. या समस्यांवर नगर परिषदेने तातडीने लक्ष घालावे, अतिक्रमण हटवावे आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, “जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गडचिरोलीतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि त्यास पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील.”
या निवेदनप्रसंगी मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहराच्या वाढत्या लोकसंख्येसोबत वाहतूक व्यवस्था सक्षम राहावी यासाठी अतिक्रमण हटवणे हे अत्यावश्यक असल्याचेही मनसेच्या प्रतिनिधींनी सांगितले.
शहरवासीयांकडूनही या मागणीला पाठिंबा मिळत असून, प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी अशी सर्वसामान्यांचीही अपेक्षा आहे. अतिक्रमणमुक्त, वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित गडचिरोलीसाठी ही मागणी निर्णायक ठरू शकते.