काटली अपघातातील चार बालकांच्या मृत्यूला कारणीभूत ट्रक चालक 48 तासांत गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात

665

काटली अपघातातील चार बालकांच्या मृत्यूला कारणीभूत ट्रक चालक 48 तासांत गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. 9 :- आरमोरी-गडचिरोली महामार्गावर 7 ऑगस्टच्या पहाटे सहा बालकांना भरधाव ट्रकने चिरडून चार जणांचा मृत्यू झालेल्या भीषण अपघातातील आरोपी ट्रक चालकास गडचिरोली पोलिसांनी केवळ 48 तासांच्या अथक तपासानंतर गजाआड केले. या कारवाईमुळे जिल्ह्यात दिलासा व्यक्त होत आहे.

काटली येथील काही बालके पहाटे व्यायामासाठी रस्त्यावर असताना गडचिरोलीकडून आरमोरीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. दोन बालकांचा जागीच मृत्यू झाला, तर जखमी झालेल्या चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान आणखी दोन बालकांचा मृत्यू झाला, तर उर्वरित दोघांना हेलिकॉप्टरद्वारे नागपूर येथे हलवून शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

अपघातानंतर अज्ञात ट्रक व चालक फरार झाले होते. घटनेच्या गंभीरतेची दखल घेत पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पाच तपास पथके स्थापन करण्यात आली. प्रत्यक्षदर्शींचे जबाब, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे व न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या साहाय्याने पोलिसांनी ट्रकचा शोध घेऊन तो छत्तीसगड राज्यातून जप्त केला.

या गुन्ह्यातील आरोपी चालक प्रविण बाळकृष्ण कोल्हे (वय 26, रा. चिचगड, ता. देवरी, जि. गोंदिया) आणि सहचालक सुनील श्रीराम मारगाये (वय 47, रा. चिचगड) यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास गडचिरोली पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोनि. विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra @gadachiroli police #crime #naxal #accident #RoadSafety #PoliceAction Show more