“स्वर्गरथ की ‘सोन्याचा रथ’?” 9.63 लाख दुरुस्ती खर्चावर गडचिरोली पेटले

565

• ‘अधिकारी राज’वर थेट भ्रष्टाचाराचे आरोप

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेत गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या प्रशासकीय कारभाराविरोधात आता संतापाचा ज्वालामुखी उसळू लागला आहे. लोकप्रतिनिधी नसल्याने चाललेल्या ‘अधिकारी राज’मध्ये मनमानी आणि आर्थिक गैरव्यवहारांना उधाण आल्याचा आरोप नागरिक उघडपणे करू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर स्वर्गरथाच्या दुरुस्तीसाठी करण्यात आलेल्या तब्बल 9.63 लाख खर्चामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नगर परिषदेच्या स्वर्गरथाच्या दुरुस्तीसाठी ही प्रचंड रक्कम खर्च करण्यात आली. मात्र, केवळ ‘दुरुस्ती’ या नावाखाली एवढा मोठा खर्च केल्याने प्रशासनाच्या प्रामाणिकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “हा खर्च आहे की सरळसरळ ‘मलिदा’?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
शहरात जोरदार चर्चेनुसार, या चार वर्षांच्या प्रशासकीय काळात अनेक कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली आहे. स्वर्गरथाच्या दुरुस्तीसाठी जवळपास 10 लाख रुपये खर्च करावे लागत असतील, तर त्याऐवजी नवीन वाहन खरेदी करणे अधिक शहाणपणाचे ठरले नसते का? असा थेट प्रश्न आता जनतेकडून विचारला जात आहे. विशेष म्हणजे, वाहनाच्या मूळ किमतीच्या 50 ते 75 टक्के रक्कम केवळ दुरुस्तीवर खर्च होणे हे आर्थिक शिस्तीचे उघड उल्लंघन मानले जात आहे.
याहूनही गंभीर बाब म्हणजे, या खर्चासाठी आवश्यक असलेली पारदर्शक निविदा प्रक्रिया (टेंडर) राबविण्यात आली होती का? की नियमांना बगल देत ‘ठरवून’ व्यवहार करण्यात आले? यावरही मोठे संशयाचे ढग दाटले आहेत. या प्रकरणामुळे नगर परिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच गंभीर शंका उपस्थित होत असून, संपूर्ण कारभार चौकशीच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, काँग्रेसचे नगरसेवक श्रीकांत शरदराव देशमुख यांनी या प्रकरणावर जोरदार आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी संपूर्ण खर्चाची तपशीलवार माहिती मागविली असून, “कोणत्या कामावर किती पैसा उधळला गेला?” याचा हिशेब लवकरच उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या एका प्रकरणातून आणखी मोठ्या गैरव्यवहारांचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नगरसेवक श्रीकांत देशमुख देशमुख यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले की, “शहरासाठी स्वर्गरथ आवश्यक आहे, यात वाद नाही. पण दुरुस्तीच्या नावाखाली एवढा प्रचंड खर्च करणे म्हणजे जनतेच्या पैशाची उघड लूट आहे. थोडी अधिक रक्कम खर्च केली असती, तर नवीन वाहन खरेदी शक्य होती. त्यामुळे या व्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.”
एकंदरीत, ‘स्वर्गरथ’ प्रकरणाने गडचिरोलीत प्रशासनाविरोधातील रोष टोकाला पोहोचला असून, आता जनतेकडून ‘हिशेब द्या’ची जोरदार मागणी होत आहे.