कठाणी नदीची स्वच्छता करत साजरा केला पर्यावरणदिन

0
118

Lokvrutt news
गडचिरोली, ५ जून :- स्थानिक वनविभाग व विविध निसर्ग संरक्षण, सामाजिक संस्थांनी एकत्र येत सोमवार (ता. ५) येथील कठाणी नदीचा परीसर स्वच्छ करत जागतिक पर्यावरणदिन उत्साहात साजरा केला.
जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून सोमवारी गडचिरोलीचे वनपरीक्षेत्र कार्यालय(प्रादेशिक) व वनपरीक्षेत्र कार्यालय (सामाजिक वनिकरण) यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीसाठी बाईक रॅली व कठाणी नदी परिसर स्वच्छतेचा कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमात ग्रीन्स संस्था, पिपल्स फॉर एन्वीरॉनमेंट ॲण्ड ॲनिमल वेलफेअर संस्थेसह विविध निसर्गप्रेमी व सामाजिक संस्थांनी सहभाग नोंदविला. पर्यावरण रक्षणाविषयी जनजागृती करण्यासाठी गडचिरोली परीक्षेत्र कार्यालयापासून ते बस स्टॅण्ड, गांधी चौकमार्गे कठाणी नदीपर्यंत बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे पर्यावरण वाचविण्याचा संदेश देण्यात आला. गडचिरोलीचे मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे यांनी कठाणी नदी परिसरातील पक्षांची ओळख करून दिली व स्वच्छता मोहिमेतही सहभागी झाले. वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यासह ग्रीन्स संस्थेच्या अध्यक्ष अंजली कुळमेथे व पीपल्स फॉर एन्वीरॉनमेंट ॲॅण्ड ॲनिमल वेलफेअरचे अजय कुकुडकर यांनीही स्वच्छता मोहिमेत हिरीरीने सहभाग नोंदविला. प्लास्टिकचे नैसर्गिकरीत्या विघटन होत नसल्याने ते नदी, नाल्यांमधे वाहत जाऊन प्रदूषण वाढते. असा कचरा पाळीव तथा वन्यप्राणी खातात आणि पोटाच्या विकारांनी मरण पावतात. कठाणी नदी परिसरात स्मशानभूमी असल्याने तेथील उरलेला कचरा नागरिक नदीमध्ये फेकून देतात. त्यामुळे नदी प्रदूषित होत आहे. म्हणून नदीतील कचरा, प्लास्टिक, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, काचेचे साहित्य, फेकलेले कपडे आदी गोळा करून नगरपालिकेच्या घंटागाडीमध्ये भरून खरपुंडी येथील कचरा व्यवस्थापन यार्डमध्ये प्रक्रिया करण्यासाठी देण्यात आले. नदी, नाले प्रदूषित झाल्याने नदीतील जलचर मरतात आणि पिण्याचे पाणी दूषित होऊन रोगराई वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे नदीनाल्यांमध्ये कचरा करू नये. तसेच पुढील पिढीचे आरोग्य धोक्यात येईल, अशी कृती टाळावी, असे आवाहन गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी केले. प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यायी वस्तूंचा वापर करावा. प्रदूषण कमी होण्यासाठी सायकल, ई-स्कूटर आदी पर्यावरण पुरक वाहनांचा वापर करावा आणि वृक्षारोपण करून ते वृक्ष जगविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन गडचिरोली वनविभागाचे उप वनसंरक्षक मिलिशदत्त शर्मा यांनी केले. या कार्यक्रमासाठी परिविक्षाधिन वनक्षेत्रपाल अमर भिसे, गडचिरोली प्रादेशिक कार्यालयातील वनपाल नवघरे, जनबंधू, वासेकर, नंदेश्वर तसेच क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते. सामाजिक वनिकरण परीक्षेत्रातील वनपाल नीलकंठ वासेकर, विद्या उइके, कुलसंगे, मनोज पिपरे तसेच इतर कार्यालयीन व क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सहायक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली वनपरिक्षेत्राचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी धीरज ढेंबरे यांनी केले. उपस्थितांचे आभार वनरक्षक बी. पी. राठोड यांनी मानले.
विविध पक्ष्यांची माहिती…
या उपक्रमाच्या प्रारंभी मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे यांनी पर्यावरणातील पक्ष्यांच्या महत्त्वाविषयी माहिती दिली. एकूण जैवविविधता टिकवण्यासाठी पक्ष्यांचे अस्तीत्व किती महत्त्वाचे आहे, याबद्दल सांगितले. यानंतर सर्वांनी या परीसरात पक्षिनिरीक्षण करत भिंगरी, पाणकावळा, रान कबुतर, राखी वटवट्या, मुनिया, बुलबुल, मुरारी, करडा धोबी, गायबगळा, गप्पीदास, कोतवाल, अशा अनेक पक्ष्यांची माहिती जाणून घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here