गडचिरोलीत समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व समाज प्रबोधन कार्यक्रम उत्साहात संपन्न
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. १५ जून २०२५ :- समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना, महाराष्ट्र राज्य शाखा – गडचिरोली यांच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि समाज प्रबोधन कार्यक्रम प्रबुद्ध बौद्ध विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, आय.टी.आय. जवळ, गडचिरोली येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात इयत्ता १०वी आणि १२वी मध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि भारतीय संविधानाची प्रत भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या यशामागील प्रेरणा, संघर्ष व भावी ध्येयधोरणाविषयी मनोगत व्यक्त करत कार्यक्रमात सर्वांना भावनिक व प्रेरणादायी क्षण अनुभवास दिला.
सत्कारानंतर समाज प्रबोधन सत्रात शिक्षण, समता, सामाजिक न्याय आणि संविधानाच्या मूल्यांवर प्रकाश टाकणारे विचार मांडण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदर्भ देत वक्त्यांनी तरुणाईला जागरूक, विचारशील आणि सामाजिक बांधिलकी जपणारे नागरिक बनण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन किरण मडावी सरांच्या हस्ते झाले. सह-उद्घाटक शेखर पुल्लिवार, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मायताई मोहूर्ले होत्या. यावेळी दिगंबर लाटेलवार, राजेशजी कलगट्टीवार, दादाजी बोलीवार, भास्कर मेश्राम, लक्ष्मण मोहूर्ले, प्रा. आलेवार, दौलत पोवरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय देवतळे यांनी केले, संदीप येनगंटीवार यांनी ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन केले तर किशोर नारुले यांनी आभार प्रदर्शन केले.
संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत नेटके नियोजन करत कार्यक्रम यशस्वी केला. परमेश्वर मोहूर्ले, विजय गंगासागर, अनिल तोटपल्लिवार, संजय गोरडवार, राहुल इप्पावार, प्रमोद रामटेके, रमेश कारेवार, देवानंद कस्तावार, हेमंत रामटेके, डोमाजी मोहूर्ले, प्रभाकर गोर्लावार, सुषमा कारेवार, पुरुषोत्तम लाटेलवार, मोहनदास इटकलवार यांचा विशेष सहभाग लाभला.
समाज बांधव, भगिनी वर्ग, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले. शिक्षण, समता व सामाजिक परिवर्तनाच्या वाटचालीत हा उपक्रम एक सकारात्मक पाऊल ठरला.

