जलस्रोत संवर्धनाचा आदर्श उपक्रम : विद्यार्थ्यांच्या हातून वनराई बंधारा
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : जलस्रोत टिकवून ठेवण्यासाठी आणि पाणी संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्यासाठी कारवाफा येथील राजीव गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय (श्री प्रभू राजारामजी शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, नागपूर द्वारा संचालित) यांच्या वतीने वनराई बंधारा बांधण्याचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.
शासनाच्या “पाणी अडवा – पाणी जिरवा” या अभियानांतर्गत हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून हा बंधारा उभारला. यावेळी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व, जलस्रोत कसे वाढवता येतात, पाणी अडवल्याने भूजल पातळी कशी वाढते, जमिनीत पाणी मुरल्याने सुपीकता कशी वाढते, उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाई कशी कमी करता येते, परिसरातील गुरे-ढोरे व शेती पिकांसाठी पाण्याची उपलब्धता कशी सुनिश्चित करता येते, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमास प्रतिष्ठित नागरिक रमेश मडावी, माजी विद्यार्थी गणेश गर्तुलवार, महेश जिल्लेवार, लोमेश मालबेलवार, साक्षी सोदुरवार, मिनाक्षी सोदुरवार, श्रुती चिट्टलवार, पालक दामा उसेंडी यांची उपस्थिती होती. तसेच शाळेचे मुख्याध्यापक घनश्याम मारबोनवार, सुरेश सहारे, हरिचंद्र बर्लावार, अजय पेलबेलवार, कु. रुपाली शेंडे, प्रणय राहुड, मोरेश्वर सुमटकर, नजीरखाँ पठाण, परमानंद कोटनाके, हरित सेना प्रमुख विद्यार्थी अनिकेत मेकलवार व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना भोजनाचा आस्वाद देण्यात आला. प्रत्यक्ष कृतीतून जलसंवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला असून, पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांची भूमिका अधिक बळकट करणारा ठरला आहे.











