पोर्ला : रिपब्लिकन पक्ष शेतकरी शेतमजुरांचा मेळावा

0
164

रिपब्लिकन पक्ष शेतकरी शेतमजुरांचा लढा सुरूच ठेवणार पोर्ला येथील शेतकरी मेळाव्यात बाळासाहेब खोब्रागडे यांचे प्रतिपादन.

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली 15 डिसेंबर : रिपब्लिकन पक्षाने शेतकरी व कामगारांसाठी नेहमीच लढा दिला आहे. 1964 मधील पक्षाचे जेलभरो आंदोलन हे ऐतिहासिक आहे ज्याने देशातील लाखो भूमिहीनांना जमिनी देण्यास सरकारला भाग पाडले. शेतकरी, शेतमजूर शेतमजुरांचा हा लढा अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष भविष्यातही सुरू ठेवणार आहे.
असे प्रतिपादन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण उर्फ ​​बाळासाहेब खोब्रागडे यांनी मंगळवारी येथून जवळच असलेल्या पोर्ला येथील तुलतुली प्रकल्पाच्या मैदानावर शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांच्या मेळाव्यात बोलतांना केले.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत होते, तर सरचिटणीस घनश्याम फुसे, उपाध्यक्ष अशोक निमगडे, कोषाध्यक्ष प्रतिक डोर्लीकर, कम्युनिस्ट पक्षाचे डॉ.महेश कोपुलवार, मा., रिपब्लिकन पक्षाच्या प्रदेश महिला आघाडी अध्यक्षा मालताई गोडघाटे, बीआरएसपीचे प्रभारी राज बनसोड, ॲड. सुरेश पानतावणे, जिल्हाध्यक्ष हंसराज उंदिरवाडे, नागपूर जिल्हाध्यक्ष संजय पाटील, नागपूर शहराध्यक्ष अरविंद गोडघाटे, कोरची नगर पंचायतच्या सभापती तेजस्विनी टेम्भूर्णे, पोर्लाच्या सरपंच निवृत्ती राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
खोब्रागडे पुढे म्हणाले की, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी मजुरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, मात्र त्याकडे योग्य लक्ष दिले जात नाही. पिकांच्या नुकसानीमुळे ते प्रचंड कर्जाखाली जगत असल्याने त्यांची परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न त्वरित सोडवावेत, अशी मागणी त्यांनी केली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात रोहिदास राऊत यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल सरकारवर जोरदार टीका केली आणि म्हणाले की, पूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
इतर नेत्यांनीही रॅलीला संबोधित करत शेतकरी, शेतमजूर आणि बेरोजगारांच्या समस्यांवर प्रकाश टाकला.
मेळाव्यात शेतकरी व बेरोजगारांशी संबंधित अनेक महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. त्यात , नरभक्षी वाघाला त्वरित जेरबंद करावे वाघाच्या दहशतीमुळे पडीत राहिलेल्या जमिनीची भरपाई द्यावी, भाताला हमीभाव 3000 रुपये प्रति क्विंटल आणि 1,000 रु. बोनस देण्यात यावे, बियाणे, खते, जीवनावश्यक वस्तूं, गॅस सिलिंडर, इंधन आदींच्या किमती कमी करण्यात यावे, दारिद्र्यरेषेखालील, भूमिहीन व झोपड पट्टीत राहणाऱ्यांचे वीजबिल माफ करण्यात यावे, सूरजागड लोहखनिजावर आधारित उद्योग जिल्ह्यात सुरू करावेत आणि त्यात स्थानिक तरुणांना नोकऱ्या द्याव्यात, कोसा उत्पादनात गुंतलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे पट्टे देण्यात यावे, विविध शासकीय कार्यालयातील नोकर भरती करण्यात यावी इत्यादी मागण्यांचा त्यात समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रकाश दुधे यांनी केले, प्रा.राजन बोरकर यांनी तर आभार हंसराज उंदिरवाडे यांनी मानले. यावेळी मंचावर केशराव समृतवार, अशोक सगोरे, अशोक खोब्रागडे, कु. मृणाल कांबळे, विमल नागराळे, नीता सहारे, ज्योती उंदीरवाडे, काजल भानारकर, संजय मेश्राम आदी उपस्थित होते.
यावेळी परिसरातील प्रगतीशील शेतकरी दीपक चुधरी, अशोक बोहरे, मुखरू झोडगे यांचा पुष्पगुच्छ व दुपट्टे देऊन सत्कार करण्यात आला. रात्री विकी भैसारे यांचा उज ळली धम्मज्योत भीमस्वरांची सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here