घरकुल व रस्त्यांच्या कामांना गती द्या – जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशासनाला निर्देश

38

घरकुल व रस्त्यांच्या कामांना गती द्या – जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशासनाला निर्देश

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि.२० मे : पंतप्रधान जनजातीय महासन्मान अभियान (पीएम-जनमन) अंतर्गत मंजूर घरकुले तसेच आदिवासी वस्ती जोडणाऱ्या रस्त्यांची कामे येत्या पंधरा दिवसांत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले आहेत.
पीएम-जनमन आणि धरती-आबा योजनेच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी विविध योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस प्रकल्प अधिकारी रणजित यादव, अ.मु.का. अधिकारी राजेंद्र भुयार, सर्व उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यात ७००१ घरकुलांसाठी अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ६८७४ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी १०२४ घरकुलांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामांना गती देण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतर्गत मंजूर १० रस्त्यांपैकी अनेक रस्त्यांची कामे वनविभागाच्या परवानग्याअभावी रखडलेली आहेत. यासाठी संबंधित मुख्य वनसंरक्षकांना तातडीने सूचित करून दोन दिवसांत परवानगी घेण्याचे आदेश देण्यात आले.
मोबाईल मेडिकल युनिटच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांचा प्रत्यक्ष प्रभाव तपासण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
धरती-आबा योजनेअंतर्गत ४११ गावांमध्ये वैयक्तिक लाभ योजना, आरोग्य तपासण्या, सौरऊर्जा सुविधा, वनधन केंद्रे आणि कृषी उपक्रम राबवले जात आहेत. ही कामे अधिक गतीने पार पडावीत यासाठी कॅम्पच्या माध्यमातून अंमलबजावणी गतिमान करावी, असे आदेशही बैठकीत देण्यात आले.