चित्तरंजनपूर येथे कृषी विद्यार्थ्यांनी दिले वैरणीवरील युरिया प्रक्रियेचे धडे
लोकवृत्त न्यूज
चामोर्शी (ता.प्र.) :– ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी चामोर्शी तालुक्यातील चित्तरंजनपूर (येणापूर) येथे पोहोचले आणि शेतकऱ्यांना वैरणीवर युरिया प्रक्रिया करण्याचे सविस्तर मार्गदर्शन केले. जनावरांचे आरोग्य, उत्पादनक्षमता आणि शरीरवाढ सुधारण्यासाठी समतोल आहाराचे महत्त्व अधोरेखित करत, त्यांनी वैरणीचा पोषणमूल्यांनी समृद्ध उपयोग कसा करावा हे शिकवले.
युरिया प्रक्रिया ही जनावरांसाठी असलेल्या कोरड्या वैरणीला पोषणमूल्यांनी समृद्ध करण्याची प्रभावी पद्धत आहे. विद्यार्थ्यांनी याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती देताना स्पष्ट केले की १० किलो कोरड्या वैरणीसाठी ४०० ग्रॅम युरिया व १ पाव गूळ यांचे मिश्रण तयार करून ती वैरणीवर शिंपडावी. यामुळे वैरणी नरम होते, पचनास सुलभ बनते आणि प्रथिनांचे प्रमाण वाढते. परिणामी जनावरांचे दूध उत्पादन वाढते, त्यांची प्रकृती सुदृढ राहते आणि शेतीसाठी अधिक उपयुक्त ठरतात.
या उपक्रमाचे मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदित्य कदम तसेच प्रलय झाडे, छबिल दुधबळे, पवन बुधबावरे, सौ. उषा गजभिये आणि पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक श्रीकांत सरदारे यांनी केले.
कार्यक्रमात कृष्णा डाकोरे, मिलन बांबोडे, अथर्व बोरकर, शुभम धकाते आणि कुणाल चलाख या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला व युरिया प्रक्रियेच्या फायदे, अंमलबजावणी आणि काळजी घेण्याच्या बाबींचे सखोल मार्गदर्शन केले.
या उपक्रमामुळे चित्तरंजनपूर येथील शेतकऱ्यांमध्ये जनावरांच्या पोषण व्यवस्थेबाबत नवचैतन्य निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन उपयुक्त ठरल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले.

