पारंपरिक गटई ठेल्यांऐवजी आधुनिक व्यवसाय साधनांची तरतूद करा ;

87

गडचिरोलीतून शासनाला मागणी

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२५ :- अनुसूचित जातीतील समाजबांधवांना अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या पारंपरिक गटई ठेल्यांच्या योजनेत बदल करून, आधुनिक व्यवसाय साधनांची तरतूद करावी, अशी मागणी समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे शासनाकडे करण्यात आली आहे.
आज २५ ऑगस्ट रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी मार्फत समाजकल्याण मंत्री यांना निवेदन सादर केले. यामध्ये पारंपरिक व्यवसायांवर उदरनिर्वाह करणे आजच्या युगात अव्यवहार्य असल्याचे स्पष्ट करत, सुशिक्षित तरुण-तरुणी बेरोजगार राहत असल्याने ते नैराश्य व व्यसनाधीनतेकडे वळत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
संघटनेने पारंपरिक गटई ठेल्यांऐवजी ऑटो-रिक्षा, पिकअप, मेटॅडोर, कार यांसारख्या आधुनिक व्यवसाय साधनांसाठी शासन अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली. तसेच उद्यमशीलता वाढीसाठी मार्गदर्शन शिबिरे व कौशल्य विकास कार्यशाळा आयोजित करण्याचीही सूचना देण्यात आली.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण मोहुर्ले, प्रदेश महिला अध्यक्ष मयाताई मोहुर्ले, उपाध्यक्ष विजय देवतळे, सचिव किशोर नरूले, सहसचिव संदीप येनगंटीवार, जिल्हा अध्यक्ष सुनील मोहुर्ले, शहराध्यक्ष किशोर देवतळे, जिल्हा सचिव योगेश गोरडवार, संतोष कोपुलवार, देवेंद्र लाटकर, राष्ट्रपाल अत्राम यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.