Home गडचिरोली गडचिरोली : बोरमाळा घाटातील वैनगंगा नदीपात्रात चार मुले बुडाली

गडचिरोली : बोरमाळा घाटातील वैनगंगा नदीपात्रात चार मुले बुडाली

218

– एकाचा मृत्यू तर तिघे थोडक्यात बचावले

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ३० : शहरापासून जवळच असलेल्या बोरमाळा घाटातील वैनगंगा नदीपात्रात चार शाळकरी मुले बुडाल्याची घटना शनिवार ३० नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. यात एकाचा मृत्यू तर तिघेजण थोडक्यात बचावले.
जयंत आझाद शेख (१०) रा. तेली मोहल्ला, हनुमान वॉर्ड, गडचिरोली असे
मृतकाचे नाव आहे. तर वाचवल्यांमध्ये रियाज शब्बीर शेख (१४), लड्डू फय्याज शेख (१३), जिशान फय्याज शेख (१५) सर्व रा. तेली मोहल्ला, हनुमान वॉर्ड, गडचिरोली यांचा समावेश आहे
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण मिळून शनिवारी बोरमाळा नदीघाटावर फिरण्यासाठी गेले. सोबत जिशान व लड्डू यांची आई ताजु शेख या देखील सोबत होत्या. दरम्यान नदीपात्रातील मौजमजा करण्याकरिता चारही मुले उतरली मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने चारही जण बुडाले. यात जयंत आझाद शेख (१०) याचा मृत्यू झाला तर इतर तिघेजण बालाबाल बचावले. चारही जण बुडाले तेव्हा त्यांनी आरडाओरड केली असता जवळच असलेल्या ताजु फय्याज शेख यांनी हिंमत करून पाण्यात उडी घेत एकटीने जिशान व लड्डू या आपल्या दोन मुलांसह रियाज यास बाहेर काढले परंतु पाण्याच्या प्रवाहात वाहत गेलेल्या जयंत शेख यास वाचविण्यात त्यांना यश आले नाही. यावेळी काही मच्छीमार मदतीसाठी धावले. त्यांनी जयंत यास बाहेर काढले. मात्र, दवाखान्यात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता तर इतर तीन मुले बचावली. सदर घटनेने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून बुडत्या मुलाना हिंमत करून पाण्यात उडी घेऊन बचावलेल्या मातेचे कौतुक करण्यात येत आहे.

Don`t copy text!