पियुष कन्स्ट्रक्शनच्या ढिसाळ नियोजनाचा फटका ; कापसी-उपरी नहराचे काम अधुरेच

39

पावसात ‘भिजत घोंगड’ होण्याची पुनरावृत्ती? शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

लोकवृत्त न्यूज,
सावली : गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत सावली तालुक्यातील कापसी ते उपरी डोनाळा दरम्यान नहराचे काँक्रिटीकरण, बंदिस्तीकरण आणि पाईपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्याचे काम मागील तीन वर्षांपासून पियुष कन्स्ट्रक्शन कंपनीकडे देण्यात आले आहे. मात्र या कंपनीच्या नियोजनशून्य व संथ गतीमुळे आजतागायत हे काम अपूर्ण आहे. परिणामी, यंदाही नहरातून योग्य पाणीपुरवठा होईल की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये गंभीर शंका व्यक्त केली जात आहे.
सावली तालुक्यातील मुख्य पीक म्हणजे धान. या पिकासाठी बारमाही पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी नहरांचे मजबुतीकरण आवश्यक आहे. पाटबंधारे विभागाकडून यासाठी कामे सुरू करण्यात आली असली, तरी पियुष कन्स्ट्रक्शनच्या निष्क्रीयतेमुळे ही कामे रखडली आहेत.
मागील वर्षी पावसाळ्यातही कंपनीने अनेक ठिकाणी काम अधुरे ठेवून हात झटकले होते. यंदा देखील त्याच पद्धतीचे काम सुरू असून, रोहिणी नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर लवकरच पावसाचा जोर वाढल्यास, काम पुन्हा रखडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘भिजत घोंगड’ म्हणून हे काम परत एका वर्षासाठी ढकलले जाईल, अशी भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी या कंपनीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून, पाटबंधारे विभागाचे दुर्लक्षही खटकत आहे. “पियुष कन्स्ट्रक्शनवर कोणाचाही वचक नाही. कामाची कोणतीही गती नाही. यामुळे आमच्या धानपिकाचे नुकसान ठरणार,” असा संतप्त सूर शेतकऱ्यांमध्ये उमटतो आहे.
शेतकऱ्यांच्या या रोषाचा आणि पावसाच्या आगमनाचा विचार करता, प्रशासनाने यामध्ये तात्काळ लक्ष घालून कंपनीला जाब विचारण्याची मागणी जोर धरत आहे. अन्यथा, ‘पाणी आहे पण पोहोचत नाही’ अशी परिस्थिती उद्भवू शकते, आणि त्याचा फटका अखेर शेतकऱ्यालाच बसणार आहे.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra @Chandrapur news #savli #ghosikhurd #Piyush Construction #पाटबंधारे विभाग )