शेवटच्या श्वासापर्यंत सुपीक शेतजमिनी अधिग्रहित होऊ देणार नाही; धरणे आंदोलनात शेतकऱ्यांचा एकसुर
लोकवृत्त न्यूज गडचिरोली : –गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून वारंवार विरोध होत असतानाही विविध एमआयडीसी प्रकल्प किंवा इतर कोणत्याही प्रकल्पाकरिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करण्याचे काम शासनाकडून सुरू आहे. नुकतेच गडचिरोली जिल्ह्यातील प्रस्तावित विमानतळाकरिता गडचिरोली तालुक्यातील गुरुवाडा, हिरापूर, शिरपूर, राखी, चांदाळा, जांभळी व इतर गावांमध्ये शेतकऱ्यांनी विरोध करूनही बळजबरीने प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले. शेतकऱ्यांकडून होत असलेल्या या विरोधाला सरकार दडपण्याचा प्रयत्न करत आहे.
इतकेच नव्हे तर चामोर्शी तालुक्यात प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पाकरिता १४ गावांतील शेतजमिनी अधिग्रहित होणार होत्या. त्याकरिता स्थानिक शेतकऱ्यांनीही विरोध केला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः १४ गावांतील शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन कुणाच्याही शेतजमिनी एमआयडीसीकरिता घेणार नाही, असे आश्वासन दिले होते. असे असतानाही आता १४ गावांतील शेतजमिनींच्या खरेदी-विक्रीवर प्रशासनाने बंदी घातली असून, शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनी खरेदी किंवा विक्री करण्यासाठी प्रशासनाची पूर्वपरवानगी घ्यावी लागत आहे. अशा प्रकारे प्रशासन शेतकऱ्यांना दाबून ठेवण्याचे व त्यांच्या परिवारात भांडणे लावण्याचे काम भाजप महायुती सरकारकडून होत आहे.
याचा निषेध म्हणून व गडचिरोली जिल्ह्यातील सुपीक शेतजमिनी कोणत्याही प्रकल्पाकरिता अधिग्रहित करण्यात येऊ नयेत, या मागणीसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय येथे भव्य धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.
“माती ही आमची माय असून, या मायेच्या रक्षणाकरिता आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढा देणार,” असा एकसुर या धरणे आंदोलनातून शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गांभीर्याने विचार करत नसेल, तर ४ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असे काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी स्पष्ट केले.
तर खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी, “आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, त्यांच्या हक्कासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू. शेतकऱ्यांची भूमिका हीच आमची भूमिका आहे,” असे सांगितले.
गावातील सर्व सरपंच व पदाधिकारी तसेच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.














